अमृत योजनेत ‘उलटा कारभार’! पाणी नाही, टाक्या नाहीत… मग घाईघाईने पाईपलाईन कशासाठी?
वणी | प्रतिनिधी
वणी शहरातील बहुचर्चित अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामात गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप आता अधिक तीव्र झाला आहे. योजनेच्या तांत्रिक क्रमाला हरताळ फासत, मूलभूत कामे प्रलंबित असतानाच शहरभर पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
तज्ज्ञांच्या मते आणि योजनेच्या नियोजनानुसार प्रथम वर्धा नदीवरील बंधारा, इंटेकवेल व जॅकवेल, त्यानंतर वर्धा नदी ते वणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत रायजिंग मेन पाईपलाईन, नवरगाव धरण ते वणीपर्यंतची रायजिंग मेन, जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम, शहरातील आवश्यक क्षमतेच्या उंच पाण्याच्या टाक्या (ESR) आणि सर्वात शेवटी शहरातील वितरणासाठी पाईपलाईनचे काम होणे अपेक्षित आहे.
मात्र प्रत्यक्षात या महत्त्वाच्या कामांना सुरुवातही झालेली नसताना शहरातील पाईपलाईन टाकण्याचे काम प्राधान्याने सुरू करण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे योजना पूर्ण होण्यास विलंब झाल्यास जमिनीत टाकलेल्या पाईपलाईनचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, जलशुद्धीकरण केंद्राचे काम अद्याप सुरू झालेले नाही. याशिवाय शहरातील नव्या पाण्याच्या टाक्यांसाठी शासनाकडून मंजुरी व निधी मिळालेला नसल्याची माहिती समोर येत आहे. निधीच उपलब्ध नसल्याने त्या कामांची निविदा प्रक्रियाही झालेली नाही. अशा परिस्थितीत पाणी साठविण्याची व्यवस्था नसताना शहरभर पाईपलाईन टाकण्यामागील नेमका उद्देश काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणात वणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. योजनेचे वैज्ञानिक नियोजन बाजूला ठेवून कामांचा क्रम बदलण्याचा निर्णय कोणाच्या निर्देशावर घेण्यात आला? यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होण्याची शक्यता आहे का? याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
नगरपरिषद प्रशासनाने या सर्व मुद्द्यांवर तातडीने खुलासा करून कामांचा अधिकृत आराखडा, मंजूर निधी, प्रशासकीय मान्यता आणि कामांचा टप्पानिहाय तपशील नागरिकांसमोर जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


















