वणीतील ‘सेवन रो हाऊस’च्या महिलांचा स्तुत्य उपक्रम वटपौर्णिमेला फेऱ्या मारण्याऐवजी केले वृक्षरोपण
केवळ फेऱ्या मारून आयुष्य वाढत नाही, झाडे लावून पर्यावरण वाचवले तरच मानवाचे आयुष्य वाढेल महिलांचा संदेश.
वनी
येथील छोरीया लेआउटमधील ‘सेवन रो हाऊस’ परिसरातील महिलांनी यंदाची वटपौर्णिमा अतिशय आगळ्यावेगळ्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी केली आहे. केवळ वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून किंवा फेऱ्या मारून पतीचे आयुष्य वाढते या पारंपरिक कल्पनेला फाटा देत, या महिलांनी एकत्र येत परिसरात वृक्षरोपण करून संगोपनाची जबाबदारी सुद्धा घेतली आणि समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला.
या प्रसंगी उपस्थित महिलांनी आपले परखड मत व्यक्त करताना सांगितले की, केवळ झाडाच्या फेऱ्या मारल्याने कोणाचे आयुष्य वाढत नसते. याउलट, जर आपण आजच्या दिवशी प्रत्येकाने किमान एक झाड लावले आणि त्याचे संवर्धन केले, तर निसर्गाचा समतोल राखला जाईल. मानवाच्या आणि येणाऱ्या पिढ्यांच्या अस्तित्वासाठी शुद्ध हवा आणि पूरक वातावरण तयार करणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून वृक्षरोपण केले पाहिजे.
या स्तुत्य आणि पर्यावरणपूरक उपक्रमामध्ये परिसरातील वैष्णवी ठाकरे, संगीता टेंभुर्डे, अर्चना मुजगेवार, अश्विनी रामगिरवार, दामिनी बल्की, स्नेहा नागतुरे या महिलांसह इतरही सुजाण नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन वृक्षरोपण केले. तसेच, आपल्या परिसरातील इतर नागरिकांनाही वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची शपथ देऊन असे सामाजिक उपक्रम राबविण्याकरिता प्रेरित केले. महिलांच्या या पुरोगामी आणि पर्यावरणपूरक निर्णयाचे कौतुक करण्यासारखी व इतर महिलांनी प्रेरणा घेण्यासारखे बाब आहे.



















