प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात शेतकऱ्याचा संताप
पुढील तीन दिवसांत प्रश्न निकाली न लागल्यास उपविभागीय कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशार
वणी | प्रतिनिधी
वणी तालुक्यातील लाठी येथील शेतकरी देविदास किसन लाडे यांनी प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त करत, आपल्या शेतीतील पाणी निचऱ्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास ८ जुलैपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून संबंधित यंत्रणेसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्या संकल्पनेतून प्रयोगात्मक स्वरूपात वणी तालुक्यात खानबाधित गावांमध्ये पाच पांदण रस्त्यांची निर्मिती करण्यात आली होती. त्यापैकी लाठी गावात दोन पांदण रस्ते करण्यात आले. मात्र लाठी–उकणी पांदण रस्त्यालगत असलेल्या गट क्रमांक २१ मधील देविदास लाडे यांच्या शेताजवळ नैसर्गिक पाणी निचऱ्याचा मार्ग बंद झाल्याने पावसाचे पाणी थेट शेतात साचत असून त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या समस्येबाबत देविदास लाडे यांनी १६ एप्रिल, २४ एप्रिल आणि १२ जून २०२६ रोजी संबंधित प्रशासनाकडे लेखी निवेदने सादर करून नैसर्गिक पाणी निचऱ्याचा मार्ग पूर्ववत करण्याची मागणी केली होती. मात्र अनेक निवेदनांनंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याने त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
लाडे यांच्या म्हणण्यानुसार, पाणी निचऱ्यासाठी सुरुवातीला सिमेंटचे भोंगे टाकण्यात आले होते. मात्र तलाठी महेश दलाल यांनी हस्तक्षेप करून ते भोंगे काढून टाकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. परिणामी, पावसाचे संपूर्ण पाणी त्यांच्या शेतात साचत असून शेतीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. सततच्या पाठपुराव्यानंतरही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने आपण मानसिकदृष्ट्याही त्रस्त झाल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
“७ जुलैपर्यंत नैसर्गिक पाणी निचऱ्याचा मार्ग मोकळा करून माझ्या शेतीचा प्रश्न सोडविण्यात आला नाही, तर ८ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करणार. त्यानंतर उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस संबंधित प्रशासन जबाबदार राहील,” असा स्पष्ट इशारा देविदास किसन लाडे यांनी दिला आहे.
शेतकऱ्याने दिलेल्या या इशाऱ्यानंतर प्रशासन या प्रकरणाची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि प्रश्नावर तातडीने तोडगा काढते का, याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


















