शिवधुरा पांदण रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी महिला शेतकऱ्यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन
मारेगाव | प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील मौजा खडकी, करणवाडी ते घोडदरा व नरसाळा येथे जाणारा शासकीय शिवधुरा (पांदण) रस्ता तात्काळ मोकळा करून देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी महिला शेतकऱ्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात श्री. संदीप संभाजी उमरे यांना पाठिंबा देत महिला शेतकरी रूपाली राहुल रोगे (वय 38) आणि शालूलाई गजानन जीवतोडे (वय 50), रा. घोडदरा, ता. मारेगाव, जि. यवतमाळ या सहभागी झाल्या आहेत.
आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मागील चार वर्षांपासून संबंधित शिवधुरा रस्ता मोकळा करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी व उपोषणे करण्यात आली. मात्र अद्यापही रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
संदीप उमरे हे 16 जून 2026 पासून तहसील कार्यालयासमोर जनावरे व बैल बनडींसह भर पावसात आमरण अन्नत्याग आंदोलन करत आहेत. तरीही प्रशासनाकडून या आंदोलनाची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्रशासन वेळकाढूपणा करत असून अतिक्रमणधारकांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रशासनाकडून रस्ता मोकळा झाल्याचे वारंवार सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“शिवधुरा रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा महिला शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच आंदोलनादरम्यान काही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


















